मुंबई : यशवंत जाधव यांच्याकडे प्राप्तीकर विभागाला सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला 2 कोटी आणि 50 लाखांचं घड्याळ दिले असल्याचा उल्लेख आहे. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान, याबाबत आता शिवसेना नेता संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मातोश्री’ला म्हणजे आईला असू शकत शकत नाही का?. महाराष्ट्रामध्ये दानधर्म करण्याची एक परंपरा आहे, मी त्यांचे वक्तव्य पाहिलं. त्यांनी आईला दान धर्मासाठी काही पैसे दिले, असं राऊत म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईतून कोट्यवधींच्या संशयास्पद नोंदी असलेली डायरीही विभागाला सापडली. या डायरीतील एका नोंदीमध्ये ‘मातोश्री’ला ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आढळल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शिवसेनेत डायरी वगैरे लिहिण्याची पद्धत नाही. डायरी वगैरे गंमत वाटते. खोटे पुरावे, खोटे गुन्हे दाखल करतात. अशा डायऱ्या विश्वास ठेवण्याच्या लायकीच्या नसतात हे सीबीआयने भाजप नेत्यांची नावं आली तेव्हा सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. डायरी हा काही पुरावा असू शकत नाही, असं राऊत म्हणाले.
जोवर उद्योग वाढत नाहीत सार्वजनिक उपक्रमांना ताकत मिळणार नाही तोवर रोजगार वाढणार नाही. आतापर्यंत लोकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार हा सरकारी उद्योगांनी दिला आहे. मात्र भाजप सरकारनं दोन पाच आपल्या मर्जीतील उद्योजकांच्या हाती देश दिला आहे. यामुळं काही मोजक्या लोकांची संपत्ती वाढणार आहे आणि पर्यायानं भाजपची संपत्ती वाढेल, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.