जळगाव : बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आलेल्या अपयशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने जळगाव येथे पार पडलेल्या बैठकीत खंत व्यक्त केली आहे. ‘एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आल्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी निवांत होते. याचाच फटका बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत बसला. आपण गाफील राहिलो आणि पराभव पत्करावा लागला’ अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे जळगावचे निरीक्षक अविनाश आदीक यांनी बोलून दाखवत खडसेंवर निशाणा साधला.
जळगावमध्ये पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल नाराजी बोलून दाखवली.
‘पक्षाच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी खडसे आणि ते नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र आले. आम्ही गाफिल राहिलो आणि त्यामुळेच आमचा घात झाला अशी कबुली आढावा बैठकीत रवींद्र पाटील यांनी स्वत:हून दिली आहे, असं अविनाश आदिक यांनी सांगितलं.
‘बोदवड नगरपंचायत निवडणुकीतील बोध घेऊन आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये योग्य ती काळजी घेतली जाईल . त्याबाबत आज झालेल्या आढावा बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आले, असंही आदिक यांनी सांगितलं