मुंबई – विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून, होणार होणार असे म्हटले जाणारी भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांची महायुती अखेर सोमवारी जाहीर करण्यात आली. कोणता पक्ष कोणत्या आणि किती जागा लाढवणार हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या असून, मित्रपक्षांसहित भाजपकडे 164 जागा आल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात गेले अनेक दिवस चर्चा सुरू होती. पण, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नव्हता. रविवारी भाजपची दिल्लीत बैठक झाली, तर शिवसेनेने रविवारपासून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले होते. सोमवारी युतीची घोषणा करण्याचे फडणवीस आणि ठाकरे यांच्यात ठरले होते. त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकाद्वारे ही घोषणा केली.
गेली पाच वर्षे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीने राज्याला नव्या उंचीवर नेऊन ठेवले असून, राज्यातील विधानसभा निवडणुकीतही महायुती कायम ठेवण्यात येणार आहे. निर्णयात आरपीआयचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत हे मित्रपक्षांचे नेतेही सहभागी आहेत, असे चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जागावाटपाचा तिढा सुटला-मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत जागावाटप ठरले असून, शिवसेना 124 आणि भाजप मित्रपक्षांसह 164 जागा लढविणार यावर शिक्कमोर्तब झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
वडाळा मतदारसंघ भाजपकडे-मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने भाजपसाठी सोडला असून, त्या बदल्यात ठाणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ शिवसेनेला दिला आहे. मुंबईतील शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघही शिवसेनेला दिला आहे.