जळगाव : काँग्रेसने कोरोनात मजुरांना तिकीटं देऊन कोरोना पसरवल्याचा थेट आरोप राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. पंतप्रधान मोदींच्या या आरोपावरून राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर आणि भाजपवर टीकेची झोड उडवली आहे. त्यातच मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही खोचक टोला लगावला आहे.
प्रंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात राजकीय दुजाभाव दिसतो. देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.
महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला हे मोदीजीं चे वक्तव्य म्हणजे खेदाची बाब आहे. पाकिस्तानमधून अतिरेकी येत आहेत ते थांबले नाहीत मोदींना असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मागच्यावेळी गोवा निवडणुकीचे चित्र वेगळे होते. गोव्यात इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. यावेळेस इतर पक्षाचा जोर गोव्यात जास्त आहे. भाजप विषयी नाराजी आहे. उत्पल पर्रीकरांनना तिकीट त्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असे भाकितही खडसेंनी केले आहे. गोव्यात सध्या भाजप पुन्हा सत्तेत येण्यासाठी जोर लावत आहे. आजच जाहीरनाम्यात भाजपने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे खडसेंचा हा अंदाज किती खरा ठरतो? हे निकालानंतरच कळेल.