मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी पुन्हा एकदा याच सीडीला घेऊन सूचक इशारा दिलाय. माझी सीडी नक्की येणार आहे. आता काढून काय निवडणुकीवर परिणाम होणार नाही. वाट बघा, असं सूचक विधान खडसे यांनी केलंय. खडसे यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय.
ओबीसी आरक्षण न मिळण्याला भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. केंद्र सरकारने ओबीसींवर अन्याय केला. वेळेवर इम्पेरिकल डेटा मिळाला असता राज्य सरकारला काही करता आलं असतं. ओबीसींवर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे. ओबीसींचं राजकारण कमी करण्यात आलं. देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक पाहून नाटक केलं आणि कायदा केला मात्र तो टिकणार नाही, अशी टीका एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपवर केली.
भाजपची वाईनच्या बाबतीत दुटप्पी भूमिका आहे. ती त्यांनी जाहीर करावी. महाराष्ट्रात वाईनला विरोध करायचा आणि मध्य प्रदेशात बिअर विक्रीला परवानगी द्यायची. गोव्यात गल्ली गल्लीत दारू मिळते. मध्यप्रदेश हा मद्य प्रदेश केलाय. देवेंद्र फडणवीसांनी गोव्यात दारू विकणार नाही, असं जाहीर करावं असं आव्हान देतो. त्यांनी जाहीरनाम्यात हा मुद्दा टाकावा म्हणजे त्यांची भूमिका समोर येईल,” असा घणाघात एकनाथ खडसे यांनी केला.