जळगाव, प्रतिनिधी – घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यात भाजपा शिवसेना युती ची घोषणा होणे अपेक्षीत होते. मात्र घटस्थापना उलटल्यानंतर देखील युतीची घोषणा झालेली नाही. यावरून पडद्याआड काहीतरी वेगळ्याच हालचाली सुरु असल्याचे समोर येतेय. मुख्यमंत्री फडणवीस हे युतीसाठी आग्रही असल्याचे समजते. तर दिल्लीश्वरांची मनस्थिती काहीशी वेगळी आहे. काल नवीदिल्लीत भाजपाच्या उमेदवार निश्चितीसाठी बैठक झाली तेव्हा दिल्लीतील श्रेष्ठींनी संपूर्ण 288 मतदारसंघाची यादी मागितली. इकडे शिवसेनेने युतीची घोषणा होण्या अगोदरच आपल्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरित करण्याचा सपाटा लावला. त्यातच शिवसेनेचा प्रखर विरोध असलेल्या स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश सेनेच्या नाकावर टिच्चून दि.2 ऑक्टोबर रोजी होत आहे. यावरून वरवर दिसणारे चित्र वेगळे असले तरी पडद्यामागे काहीतरी हालचाली सुरु असल्याने राजकीय वर्तुळात भाजपा शिवसेना युती संपुष्टात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप – शिवसेनेची युती होईल असे दोन्ही पक्षाचे नेते मंडळी आर्वजून सांगत आहेत. युतीसाठी मुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात जागा वाटपा संदर्भात चर्चा देखील झालेली आहे. परंतु काल शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी युतीची घोषणा होण्या अगोदरच शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करून त्यांना एबी फार्म देखील दिल्याने आता युती होते किंवा नाही असा प्रश्न दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्याना पडला आहे. तसेच दिल्लीत ना. अमित शाह यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या 288 उमेदवारांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे.
भाजप – सेनेची युती व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेचे उध्दव ठाकरे यांच्याशी सातत्याने संपर्क साधून जागा वाटपा संदर्भात चर्चा करून युतीसाठी आग्रह धरला होता. दिल्लीत वरिष्ठांनाही युती झाल्यास पक्षाला लाभ होईल अशी भुमिका मुख्यमंत्र्यांसह प्रदेशाध्यक्ष यांनी मांडली होती. सुरूवातीला वरिष्ठांनी युतीला हिरवा झेंडा दाखविला होता.
युतीला बंडखोरीची भिती
काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील मातब्बरांनी भाजपात प्रवेश केल्याने विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप पक्षात उमेदवारी मागणार्यांची संख्या वाढल्याने आता कोणाला तिकिट द्यावे असा प्रश्न नेत्यांना पडला आहे. त्यातच निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा अंदाज नेत्यांना आल्याने बंडखोरीच्या भितीमुळे युती न करता स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या हालचाली दिल्लीत सुरू असल्याचे समजते. दरम्यान शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी युतीची घोषणा होण्यापूर्वीच सेनेच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करून त्यांना एबी फार्म दिल्याने आता युती न होण्याची शक्यता बळावली असल्याची चर्चा राजकीय जाणकारांत होत आहे. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर युतीची घोषणा होण्याची अपेक्षा दोन्ही पक्षातील नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना होती. परंतु युतीची घोषणा न होता सेनेच्या उमेदवारांच्या नावाची यादीत जाहीर झाल्याने आता भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.