औरंगाबाद – जिल्हाधिकार्यांकडून 2 महिन्यांपूर्वी आदर्श तहसीलदाराचा पुरस्कार मिळवणारे पैठणचे तहसीलदार महेश नारायण सावंत (41) यांना एसीबीच्या अधिकार्यांनी 30 लाख रुपये लाच मागितल्या प्रकरणी अटक केली आहे. कुळाची जमीन परत देण्यासाठी या तहसीलदाराच्या वतीने 30 पैकी एक लाख रुपयांचा पहिला हप्ता मागणारी एक व्यक्ती एसबीच्या जाळ्यात अडकली आहे. रविवारी पाचोड येथे ही कारवाई करण्यात आली. महेश नारायण सावंत (41) असे तहसीलदाराचे नाव आहे.
तहसीलदाराला या प्रकरणात साथ देणारा वकील कैलास सोपान लिपणे पाटील (38, मित्रनगर हाउसिंग सोसायटी, एन-4, औरंगाबाद) व बद्रीनाथ कडुबा भवर (35, त्रिमूर्ती चौक, औरंगाबाद) यांच्याविरोधातही पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात 9 सप्टेंबर रोजी तहसीलदार सावंत यांनी वकील कैलास लिपणे व बद्रीनाथ भवर यांच्यामार्फत 30 लाखांची लाच मागितल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे. तहसीलदार महेश सावंत पैठणमध्ये 10 जून रोजी रुजू झाले होते. काम तत्काळ करणारे अशी त्यांची ओळख होती. दुष्काळ अनुदानासह इतर कामे उत्तम केली म्हणून त्यांना आदर्श तहसीलदार म्हणून गौरवण्यात आले होते.
प्रकरण काय?
तक्रारदाराची पांगरा गावात 12 एकर 14 आर जमीन आहे. ही जमीन कुळाची असून तक्रारदाराने ती खरेदी केली होती. त्यानंतर मूळ मालकाच्या नातेवाइकांनी तहसील कार्यालयात दावा दाखल केला. या प्रकरणात तक्रारदाराकडून निकाल द्यावा म्हणून 30 लाख रु. लाचेची मागणी करण्यात आली. निवडणुकीच्या कामामुळे रविवारीदेखील तहसीलदार सावंत कार्यालयात होते. एसबीने सावंत यांना तेथेच ताब्यात घेतले.