मुंबई : संपूर्ण राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, सध्या ग्रामीण भागासह मुंबईत सुद्धा रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील निर्बंध उठण्याची शक्यता नाही. कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण आणि निर्बंध गरजेचे आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी करणे राज्याचे प्राधान्य आहे. त्यामुळे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निर्बंध मागे घेतले जाणार नाहीत असं आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरचं शाळा चालू करण्या बाबत योग्य निर्णय घेतला जाईल. दरम्यान राज्यातील शाळा अजून १५ ते २० दिवस बंद राहणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाचा विस्फोट! २४ तासात देशात २ लाख ४७ हजार नवे बाधित आढळले
नागरिकांनी कोरोना संसर्ग कमी होतोय असे समजू नये, मुंबईसह पुण्यात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. बुधवारी राज्यात ४६ हजार कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. १४ टक्के कोरोनाबाधित लोक रूग्णालयात उपचार घेत आहेत. कोरोना वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.
जानेवारीत मृत्यूदर ०.३ टक्के असून राज्यात लसीकरणाचं प्रमाण घटत आहे ही चिंताजनक बाब आहे. सध्या राज्यात रोज साडेसहा लाख लोकांचे लसीकरण होत आहे. आधी हे प्रमाण ९ ते १० लाख होते. लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी लोकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. लसीकरणाचं प्रमाण घटत असल्यामुळे कडक पावले उचलावी लागतील.
लसीकरणासाठी राज्य पूर्णपणे केंद्रावर अवलंबून आहे. त्यामुळे केंद्राकडे लशींची मागणी करण्यात येणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यावेळी कोव्हिशिल्डचे ६० लाख आणि कोव्हॅक्सिनचे ४० लाख डोस देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल. राज्यात सध्या पहिला डोस घेतलेले ९० टक्के तर दुसरा डोस घेतलेले ६२ टक्के लोक आहेत. सध्या कोरोनाच रुग्ण आढळत असल तरी, कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी भीती बाळगण्याचं कारण नाही. परंतु, काळजी घेण्याची गरज असल्याचे सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले.