जालना/मुंबई प्रतिनिधी | राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाही, तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा बंद ठेवल्या मात्र दारुची दुकाने सुरू असल्याने विरोधक टीका करीत आहेत.
अशातच गर्दी होत असेल तर दारूची दुकाने, धार्मिक स्थळेही बंद करावी लागतील असा सूचक इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
रविवारी जळगाव जिल्ह्यात १७९ नवे रुग्ण सापडले. तसेच धुळे ३४ तर नंदुरबार जिल्ह्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. राज्याबरोबरच जळगाव, धुळ्यातही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारच्या तुलनेत रविवारी रुग्णसंख्या तब्बल दुपटीने वाढली.
राज्य सरकारची सुधारित नियमावली जारी
शनिवारी जाहीर केलेल्या नियमावलीत ब्यूटी पार्लर आणि व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय होता. मात्र, सुधारित निर्णयाप्रमाणे या ब्यूटी पार्लर व जीम ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, तोंडावर मास्क सक्तीचा असेल. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जाणार आहेत. याचसोबत सलूनमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे जिमही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही. राज्यात लागू झालेल्या निर्बंधानुसार रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागू असेल. दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.