नवी दिल्ली । देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह इतर चौदा जणांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर नेमके कसे कोसळले, याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच या दुर्घटनेची चौकशी पूर्ण झाली असून तपासात मोठी माहिती समोर आली आहे. दुर्घटनेमागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष काढला गेल्याचे सांगण्यात येत आहे. एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखालील चौकशी समितीने आपला अहवाल कायदा विभागाकडे पाठवला असून येत्या आठवड्यात हा अहवाल हवाईदल प्रमुखांकडे सोपवला जाणार आहे.
सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोर्ट ऑफ इंक्वॉयरी गठित करण्यात आली होती. सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 14 अधिकारी असलेले हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे कारण समितीच्या चौकशीतून सांगण्यात आले आहे. दरम्यान, वायुसेनेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य समोर आलेले नाही. मात्र, हेलिकॉप्टर क्रॅशच्या कारणांचा तपास करत असलेल्या कमिटीने खराब हवामानामुळे वैमानिक ‘विचलित’ झाले असावेत, ज्यामुळे हा अपघात झाला असल्याचे म्हंटले आहे.
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन हवाई दलाचे हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होते. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. मात्र, दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेमागे काहीतरी वेगळे कारण तर नाहीना अशी शंका उपस्थित केली जात होते.