पुणे : “हे बघा, याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसला आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की, मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं का, या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त होत उत्तर देणे टाळले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या निवडणुकीबाबत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या संदर्भातील अनेक खुलासे केले. त्यात त्यांनी अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवरही भाष्य केले होते. पहाटेच्या शपथविधीसाठी तुम्हीच अजित पवार यांना पाठवलं होतं का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर पवार यांनी मी पाठवलं असतं तर सरकार स्थापन झालं असतं, असे म्हणत साऱ्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. यावरून अजित पवार यांना गुरुवारी प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. हा प्रश्न आपण मला तुम्ही वारंवार का विचारता, असा असवालही त्यांनी केला.
मी याआधीच सांगितलं की, मला याबद्दल काहीच बोलायचं नाही. ज्या वेळेला मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तास्थापनेसाठी ऑफर केली होती, त्यावर ते म्हणाले की, मी काहीही बोलणं आणि गैरसमज करणं बरोबर नाही आणि “नो कॉमेंट्स’ असं म्हणत ते थांबले. विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीप्रकरणी महाविकास आघाडीचे नेते पुन्हा राज्यपालांची भेट घेणार आहोत. बहुमत असतानाही त्या दिवशी निवडणूक घेतलेली नाही. आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही, असेही ते म्हणाले.