कोल्हापूर : ऐन हिवाळ्यात कोल्हापुरात पुराची शक्यता निर्माण झाली आहे.कारण कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या राधानगरी धरणाचा इमर्जन्सी गेट तांत्रिक बिघाडामुळं उघडला गेला आहे. हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहरातही पाणी शिरण्याची शक्यता असल्यानं प्रशासन सावध झालं आहे.
अडकलेला धरणाचा दरवाजा बंद करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रात वाढ झाली असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावर, धुणे धुवायला जाणे टाळावे अशा असे आवाहन करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी, करवीर, कोल्हापूर शहर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ तालुक्यातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने प्रशासनाकडून कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने कोल्हापूर महानगरपालिकेच्या थेट पाइपलाइन कामातही अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जुलै महिन्यात कोल्हापुरात महापूर आला होता. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले होते. तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास महापूराची तर शक्यता आहेच, शिवाय धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.