मुंबई: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सदस्यांना शिस्तपालनावरून कान टोचले. आपण कसे वागतो याचं सदस्यांना जराही भान राहिलेलं नाही. सभागृहात येताना जाताना नमस्कार करायचा याचंही सदस्यांना भान राहिलं नाही. काही सदस्य तर दहा दहा मिनिटांनी पत्र द्यायला येतात, असे सांगताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीबाबत काही दिवसांपूर्वी घडलेला किस्सा सांगितला. एक सदस्य तर थेट मुख्यमंत्र्यांच्याच खुर्चीवर येऊन बसला. शेवटी त्याला अरे बाबा, ही मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे. तेवढी तरी राहू दे असं म्हणण्याची वेळ आली, असं अजित पवार यांनी सांगितलं.
सुरुवातीला मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता तर आमच्या सीटवर कोणीही येऊन बसतो. मुख्यमंत्र्यांच्य खुर्चीवरही येऊन बसतात. त्यांना म्हटलं तेवढी तरी राहू दे. तुला 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस. पण सदस्य ऐकत नाही, असं पवार म्हणाले.
सभागृहातील शिस्तीवर भाष्य करताना विधानसभा अध्यक्षांना अशा आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली. अशा आमदारांना सभागृहाबाहेर चार तास उभे करण्याची शिक्षा करा, जास्तच असेल तर दिवसभर उभे करा. तरच यांना शिस्त लागेल. सभागृहाचा शिष्टाचार पाळला गेला पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.