जळगाव : एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. संपात सहभागी झालेल्या जळगाव विभागाच्या २२ बस कर्मचार्यांवर सोमवारी बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्यांमध्ये ८ कर्मचारी जळगाव आगारातील तर १४ कर्मचारी भुसावळ आगारातील आहेत.
काल सोमवारी राज्यात एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यावर करण्यात येत असलेल्या कारवाई कोणत्याही परिस्थिती मागे घेतली जाणार नसल्याचं वक्तव्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची आता कोणतीही शक्यता नसल्याचं बोललं जातंय.
विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव आगारात कारवाईच्या इशार्यानंतर ३५ चालक आणि ३५ वाहक रुजू झाले आहेत. त्यामुळे तीन ते चार मुख्य मार्गावर बसेसवा सुरू आहे. नोटीस देऊनही कामावर रुजू न झाल्याने जळगाव विभागात एकूण ३५० कर्मचार्यांवर आतापर्यंत निलंबनांची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबनाच्या कारवाईनंतर बस कर्मचार्यांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. मात्र कर्मचारी तारखा मागत आहेत. सदरच्या कर्मचार्यांवर कामावर रूजू होण्याबाबत जळगाव विभाग नियंत्रकांतर्फे अल्टीमेटम देण्यात आला होता. त्यानंतरही कर्मचारी कामावर रूजू न झाल्याने जळगाव आगारातील ८ व भुसावळ आगारातील १४ अशा एकूण २२ कर्मचार्यांवर सोमवारी विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी बडतर्फीची कारवाई केली आहे. कारवाई झालेल्या कर्मचार्यांमध्ये ११ वाहक तर ११ चालक असल्याची माहिती भगवान जगनोर यांनी दिली आहे.