मुंबई: वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नुकतीच जमावबंदी लागू करण्यात आली असून यामुळे राज्य आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करतंय का अशी चर्चा सुरू झाली आहे. याच मुद्द्यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावतानाच टोपे यांनी तशी गरज नेमकी केव्हा निर्माण होईल याची माहिती दिली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच राहिल असं सांगतानाच राज्यातील शाळेबाबत सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. शाळा जशाच्या तशा सुरू राहतील, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.
ओमिक्रॉनचाही संसर्ग वाढत आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असला तरी भय नाही. पण काळजी घेतली पाहिजे. या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही सण आणि नवीन वर्षाचं स्वागत निश्चित करा. पण निर्बंधाचंही पालन करा. राज्यात आधी 500 ते 600 रुग्ण सापडत होते. आता ही रुग्णसंख्या 1400 वर गेली आहे. त्यात ओमिक्रॉनचे रुग्णही 100च्या घरात गेले आहेत. त्याची गती वाढली आणि आता जर लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
ऑक्सिनच्या अनुषंगाने आपण लॉकडाऊन ठरवणार आहोत. ज्या दिवशी 800 मॅट्रीक टन ऑक्सिजन लागेल त्या दिवशी आपण लॉकडाऊन करण्यात येईल. मात्र संसर्गाची गती अधिक असेल तर ऑक्सिजनची 800 मॅट्रीक टनाची आवश्यकता 500 मॅट्रीक टनावर आणावी लागेल. तशी परिस्थिती दिसत आहे, असं त्यांनी सांगितलं. मात्र, ओमिक्रॉनच्या बाबतीत ऑक्सिजन लागण्याची शक्यता कमी आहे. पण कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची गरज लागू शकते. आम्हाला निर्बंध लावायचे नाही. आमचा हेतू नये. फक्त काळजीपोटीच आम्ही हे निर्बंध लावत आहोत. आम्ही लावत असलेल्या निर्बंधांचा चुकीचा अर्थ काढू नये. आरोग्याच्या स्पिरीटने त्याकडे पाहावं, असंही त्यांनी सांगितलं.