मुंबई: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आता यावरून मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझी नाही. माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
माझा बाप काढून उद्धवजींच्या जवळ जावून काय मिळणार आहे? त्यांना जे मिळायचं ते मिळू देत, असं सांगतानाच माझ्या बापाने निवडणूक लढवली नव्हती. ते मिलमध्ये काम करत होते. त्यांचा अपघात झाल्यानंतर 11 महिन्यानंतर ते मिलमध्ये रुजू झाले होते, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरून पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. उद्धवजींच्या तब्येतीबाबत त्यांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. मला खूप कल्चर आहे. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो या माणसाच्या आयुष्यात काय आहे. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी, असंही ते म्हणाले.