जळगाव : गेल्या महिनाभरापासून संपावर गेलेल्या व अनेक मागण्या मान्य होऊनही कामावर न परतलेल्या एसटी कामगारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आता समजूतदारपणाची भूमिका घ्यावी. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. नागरिकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, आता त्यांचीही सहनशीलता संपत आली आहे, त्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. जळगावसह भुसावळ येथे त्यांच्या उपस्थितीत विकास कामांचे लाेकार्पण, नवीन कामांचा शुभारंभ होईल. आज सकाळी त्यांच्या उपस्थितीत जळगाव येथे नियोजन समितीसह विविध निधींचा आढावा बैठक पार पडली. आढावा बैठक झाल्यानतंर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आपली भूमिका मांडली.
एसटी कर्मचाऱ्यांनी ज्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप केला होता. त्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. कोर्टानेही तसे आदेश दिले आहेत. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्याशिवाय निर्णय घेतला जाणार नाही. कर्मचाऱ्यांचे पगार शेजारील राज्यातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी होते. त्यामुळे पगारात वाढ देत ते बरोबरीला आणण्यात आले आहेत. एसटी हे गरिबांचे वाहन आहे. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. नागरिकांचे देखील हाल होत आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली.
…तर नोकरीचा प्रश्न निर्माण होईल!
आतापर्यंत परीवहन मंत्री अनिल परब हे देखील संयम दाखवित आहे. मात्र, आता त्यांच्यीही सहनशीलता संपण्याची वेळ आली आहे. त्यांचा अंत पाहू नका. शासनाने मेस्मा लागू करण्याचा निर्णय घेतला किंवा नवीन भरती करण्याचा निर्णय घेतल्यास नोकरीचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो, असे सांगत तुटेपर्यंत ताणू नका, असा इशारा देखील अजित पवार यांनी दिला आहे.