मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध राज्य शासनाने शिथिल केले आहेत. शनिवारी शासनातर्फे नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी नवीन नियमावली जारी केली असून त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापुढे मास्कऐवजी तोंड रुमालाने झाकल्यास तो मास्क म्हणून गृहीत धरले जाणार नाही. तोंडावर मास्क न लावणारे, मास्कऐवजी रुमाल वापरणारे, सामाजिक अंतर न ठेवणारे तसेच इतर कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर ५०० रूपये तर आस्थापनावर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मंगल कार्यालये, सभागृहे बंदीस्त जागेतील कार्यक्रम ५० टक्के क्षमता, खुल्या असलेल्या समारंभासाठी क्षमतेच्या २५ टक्के लाेकांना उपस्थितीची परवानगी आहे. क्षमता ठरवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला आहे. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनाशी संबंधीत सर्व व्यक्ती, सेवा देणारे तसेच सहभागी होणाऱ्यांचे लसीकरण झालेले आवश्यक आहे.कोणत्याही संमेलन, मेळाव्यासाठी एक हजारापेक्षा जास्त लाेकांची उपस्थिती असल्यास निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचक प्रतिनिधी खात्री करतील.
वर्तनाचे उल्लंघन झाल्यास प्रतिनिधींना तो कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी आहे.एखाद्या संस्थेने कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या संस्था,आस्थापनांना ५० हजार रुपये दंडाची आकारणी करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोवीड १९ अधिसूचना अंमलात असेपर्यंत आस्थापना बंद करण्यात येईल. टॅक्सी किंवा खासगी वाहतूक करणारे चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये कोवीड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येईल.बसेसच्या मालकांना १० हजार रुपये दंड आकारण्यात येईल,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.