मुंबई: पूर्व मध्य व पश्चिम मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं असून याचा परिणाम महाराष्ट्रावर जाणवणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तविला आहे. मच्छिमारांनी अरबी समुद्रात 21 आणि 22 नोव्हेंबरला जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट जारी
अरबी समुद्रातील हवेची स्थिती पाहता प्रादेशिक हवामान विभागाकडून अंदाज जारी करण्यात आले आहेत. तर,हवामान विभागानं रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सागंली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना 21 नोव्हेंबरसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, 22 नोव्हेंबरला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार
दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये जोरदार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हवामान विभागानं पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. आंध्रप्रदेश आणि इतर राज्यात दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. गोवा आणि तळकोकणातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.