मुंबई- भाजप-शिवसेना युतीवर भाष्य करणे टाळत, ’राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार’, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होणार नसल्याचे संकेत दिले. या बरोबरच ’देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील’, अशी घोषणा करत शहा यांनी पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे शहा यांनी राज्यातील भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी त्यांनी कलम 370 वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली.
भाजप शिवसेना युतीसंदर्भात कोणतेही भाष्य न करता आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना त्यांनी मुख्यमत्र्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर कायम ठेवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्यात गुंतवणूक, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला पुढे आणले, असे म्हणत शहा यांनी मुख्यमंत्री फडणवीस हाच राज्यातील भाजपचा चेहरा असल्याचे अधोरेखित केले.
’शरद पवार, कान खोलकर सुन लो’
काश्मीरमध्ये 370 कलम लागू केल्यापासून या कलमामुळे 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमधील कलम 370 आणि 35 अ हटवल्यामुळे तेथून दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी हे कान उघडून ऐकावे असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला. कलम 370 हटवण्याला शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचेही ते म्हणाले. गेल्या 5 ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चाललेली नाही, हेही लक्षात घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुम्ही विरोध करता की समर्थन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकांना स्पष्ट सांगावे असे आवाहन शहा यांनी यावेळी केले. बांगलादेशच्या युद्धाच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी पाठिंबा दिला होता. अशा मुद्द्यांमध्ये राजकारण आणता कामा नये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र कलम 370 हटवण्याच्या निर्णयात राजकारण आणले अशीही टीका त्यांनी केली.
राज्यातील जनता भ्रष्टवादी काँग्रेस पक्षाच्या मागे राज्यातील जनता कधीही जाणार नसल्याचे सांगत शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन कमल 370 काय आहे, हे जनतेला समजून सांगावे, असे आवाहन शहा यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
आणखी काय म्हणाले अमित शहा
युद्धविराम केल्यानेच पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग बनला
काश्मिरात आता दलित आणि आदिवासींसाठी आरक्षण लागू झाले
370 कलम हटवल्यानंतर काश्मीरात दलित, आदिवासींसाठी अॅट्रॉसिटी अॅक्ट लागू झाला.
काश्मीरमधील काही घराण्यांनी काश्मीरला लुटलं