भाऊबीज सण हा हिंदु धर्मातील भाऊ-बहीण मोठ्या उत्सवाने साजरा करणाऱ्या सणापैकी एक सण आहे. हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया (यमद्वितीया) या दिवशी साजरा केला जातो. दिवाळीच्या उत्सव दरम्यान वसुबारस, धनतेरस, लक्ष्मीपूजन, पाडवा नंतर येणारा भाऊबीज सण भाऊ – बहीण यांचा मोठा सण मानला जातो, भाऊबीज सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे.
भाऊबीज सण कसा साजरा करतात…
भाऊबीज सणाच्या दिवशी बहिण भावाला गोडधोड भोजन करवते दरम्यान सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस भावाला ओवाळते. ओवाळून झाल्यावर भाऊ ओवाळणीच्या ताटात ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सन्मान पूर्वक सत्कार करतो.
भाऊबीजीच्या दिवशी बहीण भावाला आरती ओवाळून त्याची पूजा करीत असते,भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून म्हणजे मृत्यूपासून भावाची सुटका व्हावी व तो चिरंजीव राहावा हा यामागचा हेतू असतो, भाऊ आपल्या यथाशक्तीप्रमाणे पैसे, कापड,दागिना असे वस्तू ओवाळणीच्या ताटात टाकत बहिणीचा सन्मानपूर्वक सत्कार करतो.
काय आहे पौराणिक कथा…
भाऊबीज सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा असून या दिवशी यमराजा आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी गोडधोड भोजन केले होते म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असंही म्हटलं जातं.या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानलं जातं.
यम आणि यमी दोघं भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की, ज्यावेळेला यमराजाचा मृत्यू झाला त्यावेळी बहीण यमीला एवढं दुःख झालं होतं की, यमी आपलं रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबत नव्हती तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्दल चे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीज सणाची प्रथा पडली. आपल्या भावाचे आयुष्य वाढावे म्हणून बहिणीने यमराजाची पूजा आणि प्रार्थना करावी.