नवी दिल्ली – मागील गेल्या काही महिन्यात इंधन, गॅस सिलिंडरसह खाद्यतेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली असून त्यात आता साखारेच्या भावात वाढ झाली आहे. साखरेचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊन देखील देशात साखरेच्या दरात प्रति कोलो 5 रुपयांची वाढ झाली आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 26 जुलै 2021 ते 26 ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांच्या कालावधीत साखरेचे दर तब्बल पाच रुपयांनी वाढले आहेत. 26 जुलै 2021 ला साखरेचे दर 38 रुपये प्रति किलो होते. त्यामध्ये वाढ होऊन 26 ऑक्टोबरला साखर 43 रुपयांवर पोहोचले आहेत.
भारतामध्ये दरवर्षी साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र गेल्या वर्षी जगासह देशावर कोरोनाचे संकट असल्याने निर्यातीला ब्रेक लागला होता. निर्यात घटल्याने मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला, त्यामुळे दर नियंत्रणात होते. मात्र आता हळूहळू जग कोरोनाच्या संकटातून सावरत असून, निर्यातीला वेग आला आहे. भारताने साखरेची निर्यात वाढवल्याने गेल्या तीन महिन्यामध्ये साखरेचे दर वाढले असल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चालू वर्षामध्ये साखर कारखान्यांनी तब्बल 72 लाख टन साखरेची निर्यात केली आहे. केंद्राकडून कारखान्यांना निर्यात करामध्ये सूट देण्यात आली असून, त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा सध्या साखर उद्योगाला होत आहे. मात्र निर्यात वाढल्याने दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे दर देखील वाढले आहेत.