मुंबई : सध्या थंडीला सुरवात झाली असल्याने अंडी आणि चिकनच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्याभरापूर्वी घटलेल्या अंड्यांच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. थंडीमुळे चिकन आणि अंडे खाणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
त्यामुळे किरकोळ बाजारात अंड्याची किंमत ही 7 रुपये झाली आहे तर चिकन हे 250 रुपये किलोवर गेले आहे. हवामानातील बदलाचे परिणाम सध्या या मार्केटवर जाणवत असून भविष्यात अणखीन दर वाढतील अशी शंका उपस्थित केली जात आहे.
केवळ बदलत्या वातावरणामुळेच नाही तर गतमहिन्याच झालेल्या पावसामुळे अनेक लहान पिल्लांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे कोंबड्याचा तुटवडा बाजारात भासत आहे.
खर्च वाढला की किमतीमध्ये फरक
पोल्ट्रीफार्म चालकांचा खाद्यावरील खर्च वाढला आहे. त्यामुळेच घाऊक बाजारात कोंबडीची किंमत 160 रुपये किलो झाली आहे. तर अंड्यांची किंमत ठोक बाजारात 4 ते 5 रुपये आहे. मात्र, येत्या काही दिवसांत त्याची किंमत दोन रुपयांनी महाग होऊ शकत. बुधवारी दिल्लीतील गाझीपूर मुरगामंडी येथे ही किंमत 150 रुपये किलो होती.
दुसरीकडे, थेट ग्राहकापर्यंत माल पोहचेपर्यंत त्याची किंमत ही 200 रुपयांवरून 250 रुपये प्रति किलो झाली आहे. कुक्कुटपालन व्यवसाय करीत असलेले नजीब मलिक म्हणाले की, नवरात्रीच्या शेवटी कोंबडीच्या किंमतीत वाढ झाली. येत्या काही दिवसांत त्यात सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे आधीच शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.