मुंबई : करोनाची साथ नियंत्रणात येत असून चालू महिन्यातील पहिल्या २६ दिवसांमध्ये सर्वांत कमी रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. राज्यातील मृत्यूदरही घटल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात लसीकरणामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याचे संसर्गजन्य आजाराचे विशेषज्ञ डॉ. विवेक मोरे यांनी सांगितले. पूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत वाढ दिसून येत होती तेथेही लसीकरणामुळे निश्चित फायदा झाल्याचे दिसते. सध्या राज्यात जेथे रुग्णसंख्या अधिक आहे त्या भागांत वेग वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या कालावधीत राज्यात एकूण ५३,०५६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील मृत्यूदर १.३९ टक्के नोंदवण्यात आला आहे. एप्रिलमध्ये तो १.६५ टक्के होता. या वर्षातील मे व जून या दोन्ही महिन्यांत सर्वाधिक म्हणजे २.४८ टक्के मृत्यूदराची नोंद झाली. या वर्षी एप्रिलमध्ये २९,५५१ तर, मे महिन्यात २८,६६४ रुग्णांचा मृत्यू झाला.
दैनदिन रुग्णसंख्येमध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक ५९,६४७ तर, मे महिन्यात ३६,१११ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. ऑगस्टनंतर ही संख्या कमी होत गेली. सप्टेंबरमध्ये ३,५३५ तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या २६ दिवसांत २,०४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, रायगड या जिल्ह्यांमध्ये एकूण रुग्णसंख्येच्या ८०.२२ टक्के रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे, कोकण तसेच, नाशिक येथे उपचाराधीन रुग्णसंख्या अधिक आहे. औरंगाबाद, नागपूर अमरावती या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये वाढत असलेली संख्या कमी होताना दिसते. मुंबईत २० ते २६ ऑक्टोबरच्या कालावधीत २,७१९ तर पुण्यात २,१६१ रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे येथे १,२६४ तर रायगडमध्ये ४०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.