मुंबई: आधीच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांच्या संकटात आणखी भर पडणार असल्याची शक्यता आहे. कारण सततच्या इंधन दरवाढीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) प्रचंड तोटा होत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकीटाच्या दरात 17 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्वात महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाडेवाढीसाठी राज्याचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय परिवहन समिती तयार करण्यात आली आहे. समितीचा अहवाल महामंडळाच्या संचालक मंडळासमोर सादर करण्यात येईल.
एसटीला आतापर्यंत 12500 कोटी रुपयांचा संचित तोटा झाला आहे. याशिवाय कोट्यवधांची देणी शिल्लक आहेत. डिझेल दरात सातत्याने वाढ होत असल्याने खर्चात वाढ झाली आहे. कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे 12 तास काम करूनही कर्मचाऱ्यांचे वेतन अनेकदा रखडले आहे.
हकीम समितीच्या शिफारशीनुसार महागाईच्या आधारावर भाडेवाढ होत असल्याने, डिझेलचे दर दहा टक्क्यांहून अधिक वाढल्यास, टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरातील वाढीच्या निकषांचा अभ्यास केला जातो. जून 2018 मध्ये करण्यात आलेली शेवटची भाडेवाढ ज्या निकषांवर करण्यात आली. त्याचाही अभ्यास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.