नाशिक – जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यावरून टीका केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली.
“काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.