नवी दिल्ली : देशात गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 14 हजार 146 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 144 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या आता दोन लाखांच्या आत आहे.
गेल्या 24 तासात भारतात 19 हजार 788 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 40 लाख 67 हजार 719 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 34 लाख 19 हजार 749 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 52 हजार 124 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 1 लाख 95 हजार 846 इतके सध्याच्या घडीला सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 97 कोटी 65 लाख 89 हजार 540 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.