मुंबई : राज्यातील आमदारांना दिवाळीआधीच ठाकरे सरकारकडून गिफ्ट दिलं आहे. राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत 1 कोटी रुपयांची वाढ केली आहे. निधीत 1 कोटी रुपयांची घसघशीत वाढ केल्यामुळे सर्व आमदारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
राज्य विधिमंडळात विधान परिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 असे राज्यात एकूण ३६६ आमदार आहेत. त्यांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी ३ कोटी रुपये निधी दिला जात होता. त्यात 1 कोटीची वाढ करण्यात आल्यामुळे तो चार कोटीपर्यंत पोहोचला आहे. वाढीव निधीच्या माध्यमातून आमदारांना आपल्या मतदारसंघातील विकासकामे पूर्ण क्षमतेने करता यावीत हा या निर्णयामागील हेतू आहे. वाढीव निधीचा उपयोग विशेषत: शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी अशा सार्वजनिक उपक्रमांची डागडुजी तसेच बांधणी करण्यासाठी करण्यात येतो.