नवी दिल्ली: सध्या सणासुदीचे दिवस आहेत. अशा काळामध्ये रोजच्या आहारात आवश्यक असलेल्या खाद्यतेलाचे दर हे वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.सरकारने पाम आणि सूर्यफूल तेलावरील कृषी उपकर आणि कस्टम ड्यूटी कमी केली आहे. मोहरीचे तेल वगळता इतर तेला दरामध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सॉल्व्हंट एक्सट्रॅकर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी व्ही मेहता यांनी सांगितले आहे.
सरकारच्या या निर्णयानुसार, कच्च्या पाम तेलावरील शुल्क 8.25% (आधी 24.75%), आरबीडी पामोलिन 19.25 (आधी 35.75), आरबीडी पाम तेलावर 19.25 (आधी 35.75), कच्च्या सोया तेलावरील शुल्क कमी करण्यात आले 5.5 (आधी 24.75) आहे.
सोया तेलावर 19.5 (आधी 35.75), कच्च्या सूर्यफूल तेलावर 5.5 (आधी 24.75) आणि रिफाईंड सूर्यफूल तेलावर 19.25 (आधी 35.75) शुल्क कमी केल्यामुळे, सीपीओच्या किंमतीत प्रतिटन 14,114.27 रुपये, आरबीडीची किंमत प्रतिटन 14526.45 रुपयांनी, सोया तेल 19351.95 रुपये प्रति टन रुपयांनी स्वस्त झाले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर खाद्यतेलात 15 रुपयांची कपात होऊ शकते.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (सीबीआयसी) अधिसूचनेत म्हटले आहे की, 14 ऑक्टोबरपासून शुल्कात कपात लागू होईल आणि 31 मार्च 2022 पर्यंत लागू राहील.