मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) लवकरच राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आवश्यक रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार विविध सरकारी विभागांना रिक्त पदांचा लेखाजोखा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध विभागाची मागणीपत्र एमपीएससीला प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचं मागणीपत्र आयोगाला झाले आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 376 जागांसाठी भरती केली जाईल. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जागा कमी काढल्यानं विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
राज्य शासनाचे साधारणपणे तीन टक्के कर्मचारी दरवर्षी निवृत्त होतात. चार-पाच वर्षांपासून राज्यातील भरतीप्रक्रिया बंद असल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून शासकीय कामकाजावर परिणाम होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सर्वच विभागांमधील क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारकडून घेण्यात आला होता.या निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी दिलीप वळसे पाटलांनी केली होती. पहिल्या टप्प्यात कोणत्याही परिस्थिती 31 डिसेंबरपूर्वी 5200 पदांची भरती करणार असून, त्यानंतर टप्प्याटप्प्याने 7 हजरा पदे भरली जातील, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती.