मुंबई : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर कॉलेज कधी सुरु होणार असा प्रश्न विचारला जात होता. दिवाळीनंतर कॉलेज सुरु करण्यात येतील अशी माहिती शिक्षणविभागाकडून देण्यात आली होती. पण आता उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. दोन दिवसात कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेणार असून परवानगी मिळाल्यास कॉलेज सुरु होण्याची तारीख लवकच जाहीर होईल असे शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले.
शिक्षण विभागातर्फे यासंदर्भातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन प्रधान सचिवांना पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार आहे.राज्यातील काही महाविद्यालयांच्या संकुलात करोनाबाधित रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष असल्याने, महाविद्यालय सुरू करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत येत्या आठवड्यात आढावा घेउन महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेऊ असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.
विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत नुकतीच बैठक झाली आहे. त्यामध्ये विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याचा अहवाल काही दिवसांत सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान,तीन दिवसांपूर्वी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरणाबाबत माहिती दिली. ‘टास्क फोर्सने सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही,त्याचा मोठा परीणाम होणार नाही. असं अधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेनंतर लक्षात आलं आहे. अमेरिका, युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली पण तिचा प्रभाव जास्त दिसून आला नाही. मात्र लसीकरणामुळे कोरोनाची दाहकता कमी करता येऊ शकते, असंही ते म्हणाले.