जळगाव प्रतिनिधी । लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. दरम्यान, या बंदला जळगाव शहरातील व्यापारी व दुकानदारांकडून बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
जळगावात सकाळच्या सत्रात बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवला नाही. त्यानतंर आघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यानतंर मुख्य बाजारपेठ तासभर बंद होती. मात्र, नेते निघून जाताच व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडलीत. दुपारपर्यंत सुरु- बंद चा खेळ सुरु होता.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी व विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे झालेत. मात्र, सकाळ सत्रात शहरातील बाजारपेठ नेहमीप्रमाणे उघडली होती. शहरातील गोलाणी मार्केट, टॉवर चौक, सेंट्रल फुले मार्केट, सराफ बाजार, दाणाबाजारातील दुकाने उघडली होती. मात्र, त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे नेते कॉंग्रेस भवन परिसरात एकत्र आले.
यात काँग्रसेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार , माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरिष चौधरी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, शिवसेनेचे महानगराध्यक्ष तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी शहरात फिरून महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन व्यापारीवर्गाला केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. दाणाबाजार परिसरात काही ठिकाणी व्यापारी व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये दुकाने बंद करण्याच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली होती. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.