मुंबई: महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या बंदवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. या बंदमधून सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असा हल्ला करतानाच आजचा बंद हा सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर हे सरकार संध्याकाळपर्यंत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करतील किंवा त्यांचा ढोंगीपणा उघड होईल, अशी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा उघड झाला असून हे सरकारच पूर्णपणे ढोंगी आहे. लखीमपूरच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रात बंद केला जातो. पण दुसरीकडे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मात्र हे सरकार एकही पैसा द्यायला तयार नाही. आज राज्यातील शेतकरी संकटात आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आतापर्यंत तब्बल दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन २५ हजाराच्या आणि ५० हजाराच्या ज्या काही घोषणा केल्या त्या सर्व घोषणा हवेतच विरलेल्या आहेत. अनेक संकटांमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली नाही आणि जरी केली असेल तरी ते अपुरी मदत आहे. यामुळे भाजपचेच सरकार बरे होते असे म्हटले जात असल्याचे फडणवीस म्हणाले.
मावळमध्ये गोळीबार हेच जालियनवाला होतं
याच सरकारने मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. गोळीबार करणाऱ्यांना आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का? असा सवाल करतानाच मावळमध्ये गोळीबार झाला तो जालियनवाला बाग होता, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. आजचा बंद संवेदना दाखवणारा नाही तर राजकीय पोळी भाजण्यासाठीचा आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही. प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस, जीएसटी प्रशासनाचा वापर करून लोकांना बंद करायला भाग पाडलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.