नवी दिल्ली : देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. सध्या देशभरातील वीजउत्पादन कंपन्यांकडे ७२ लाख टन कोळसा साठा आहे. हा कोळसा चार दिवस पुरेल इतका आहे. पण कोल इंडिया लिमिटेडकडे ४०० लाख टनांचा साठा शिल्लक असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. शिल्लक साठा लवकरच वीजउत्पादन कंपन्यांपर्यंत पोहोचवला जाईल, व ऊर्जा प्रकल्पांची मागणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांनी कोळसाटंचाईची धास्ती घेतली असताना, कोळसा मंत्रालयाने असा दावा केल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
देशभरात निर्माण झालेल्या कोळसाटंचाईवर मात करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. प्रामुख्याने पावसाळा सरत आल्याने कोळसाउत्पादन वाढते आहे. दररोज तीन लाख टन अधिक कोळसा वीज कंपन्यांना पुरवला जाईल व ऊर्जा प्रकल्पांची मागणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.
यंदा देशभरात पाऊस दमदार असतानादेखील कोल इंडिया लिमिटेडने २२५ लाख टन कोळसा ऊर्जा कंपन्यांना पुरवला. मागील वर्षीपेक्षा त्यात २४ टक्के वाढ झाली आहे. या सर्व स्थितीत कोळसा अभावामुळे देश अंधारात जाईल ही भीती अनाठायी आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
देशभरातील कोळसा खाण क्षेत्रातील पावसाळा आता सरू लागला आहे. त्यामुळे उत्पादन सातत्याने वाढते आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत दररोज होणारे १४ लाख टनांचे उत्पादन आता १५ लाख टनांवर नेण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत ते १७ लाख टनांवर नेले जाईल, अशी हमीदेखील कोळसा मंत्रालयाने दिली आहे.