नवी दिल्ली : कोरोनाचे संकट ओसरत असताना देशात आणखी एक संकट आले आहे. देशात कोळशाचा तुडवडा निर्माण झाल्यामुळे ४ दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे. अतिवृष्टीमुळे बहुतांश ओपन कास्ट कोळसा खाणींत पाणी भरले असून, उत्पादनाला फटका बसला आहे.त्यामुळे देशावर वीज उपलब्धतेचे संकट येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी सांगितले की, ‘मी सुरक्षित नाही, कोळशापासून निर्माण होणाऱ्या ४०-५० हजार मेगावॅट वीजेचा पुढील ३ दिवसांकरता तुटवडा असेल तर तुम्हीही सुरक्षित नाही.’ असे असले तरी देशात कुठेही भारनियमन करण्यात आले नसल्याचे आर. के. सिंह यांनी सांगितले.
देशात ३ लाख ८८ हजार मेगावॅट वीजेची मागणी आहे. यापैकी २ लाख २ हजार मेगावॅट वीजनिर्मिती कोळशापासून केली जाते. कोळशापासून वीज निर्मिती करणाऱ्या १०४ केंद्रांपैकी १५ वीज निर्मिती केंद्रे ठप्प झाली आहेत, तर ३९ केंद्रांवर तीन दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा उपलब्ध आहे.
चीनमध्येही असाच प्रकार गेल्या महिन्यात झाल्यामुळे त्या ठिकाणी वीज टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला होता. भारतात गरजेच्या 75 टक्के वीज उत्पादन देशातील कोळशापासून निर्माण होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कोळसा उत्पादन करणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कोळशाच्या उत्पादनावर आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
एकूण परिस्थिती पाहता आगामी काळामध्ये ग्राहकांना विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या वीज निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि वितरण करणाऱ्या कंपन्या ऊर्जा नियंत्रकाकडे मागण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मिळालेल्या माहितीनुसार देशातील ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपन्याकडे फक्त 81 लाख एवढा कोळसा आहे.