मुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दरम्यान, राज्यात ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरु केल्या जाणार असून लॉकडाऊन करण्यात आल्यापासून ऑफलाईन पद्धतीनं कॉलेज सुरु झालेली नाहीत. अशातच कॉलेज कधी सुरु होणार यासंदर्भात महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. यंदाचं शैक्षणिक वर्षा 1 नोव्हेंबरपासून सुरु होईल. मात्र, प्रत्यक्षात कॉलेज दिवाळीनंतर सुरु होतील, असं सामंत म्हणाले.
अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली आहे. कॉलेज सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले टाकत आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले. टास्क फोर्ससोबत चर्चा करून एसओपी बनवली जाईल व मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर निर्णय होईल, असं उदय सामंत म्हणाले.
दिवाळीनंतर फिजिकल कॉलेज सुरु
1 नोव्हेंपासून शैक्षणिक वर्ष होईल. परंतु तेव्हाच दिवाळी असल्यानं कदाचित दिवाळीनंतर शैक्षणिक वर्ष सुरू होईल.तेव्हाच फिजिकल कॉलेज सुरू करण्याचा विचार करतोय, असं उदय सामंत म्हणाले.महाविद्यालय सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी यायचे की नाही हे त्यांनी ठरवावे. उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असं उदय सामंत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या परवानगीनंतरच महाविद्यालय सुरु
उदय सामंत यांनी कॉलेज सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं म्हटलं आहे. कोरोना कमी झालेला आहे, तिथं कॉलेज सुरू करायला काहीच अर्थ नाही. पण याकरीता मुख्यमंत्र्यांची परवानगी लागेल, असं सामंत म्हणाले.