मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे राज्यामध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे पुढील तीन ते चार दिवसात कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट :
पालघर
ठाणे
रायगड
रत्नागिरी
नाशिक
धुळे
जळगाव
या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई
सिंधुदुर्ग
नंदुरबार
पुणे
अहमदनगर
औरंगाबाद
जालना
बीड
परभणी
हिंगोली