जळगाव, दि.२७ (प्रतिनिधी) : गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला देखील ‘रेड अलर्ट’ मिळाला दिनांक २६ ते ३० या दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली असल्याचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्यासह सर्व यंत्रणाना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
आदेशात म्हटले आहे की, तालुक्यातील नदी, धरणे, तलाव, असलेल्या भागातील तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच आपल्याकडील शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. शोध व बचाव गट कार्यरत ठेवावे. तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या सातत्याने संपर्कात राहून कोणतीही दुर्घटना घडल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती द्यावी. तसेच या काळात विभाग प्रमुख, तलाठी, मंडळ अधिकारी व तालुकास्तरीय अधिकारी यांनी मुख्यलय सोडू नये. त्याच २४ तास तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दि. 26 ते 29 सप्टेंबर 2021 या कालावधीत नाशिक विभागातील जळगावसह काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने 27 सप्टेंबर रोजी राज्यातील किनारपट्टीवरील जिल्ह्यासह काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून त्यात नाशिक विभागातील जळगाव व धुळे जिल्ह्याचा समावेश आहे.
त्यामुळे जिल्ह्यात जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे तसेच नदीकाठच्या परिसरातील गावाच्या लोकांनी सतर्क राहावे, नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन इत्यादी सुरक्षित स्थळी ठेवण्यात यावे. सर्व पुरप्रवण क्षेत्रातील गावांना सावधानतेचा इशारा देण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
00000