जळगाव : बंगालच्या उपसागरात घोंघावणाऱ्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘गुलाब’ चक्रिवादळाचे रूपांतर झाले आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, मंगळवारी २८ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
गुलाब चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा रुद्रावतार पाहायला मिळत आहे. आज मध्य रात्रीपर्यंत हे वादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील गोपालपूर आणि कलिंगपट्नम दरम्यान धडकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याला आज रविवारी आणि उद्या सोमवारसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आले असून मंगळवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसापासून पाऊस सुरु आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक धरण फुल भरली आहे.