मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या सामनातील रोखठोक सदरामध्ये पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आजच्या रोखठोकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटलांनी आम्हाला पत्रं लिहिलं, त्यामुळे त्यांचंच धोतर सुटलंय, असं सांगतानाच महाराष्ट्रातील विरोधकांनी हास्यजत्रा करून ठेवली आहे. किती मनोरंजन कराल? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा भाजप व महाविकास आघाडी यांच्यात सामना रंगला आहे. किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तर, चंद्रकांत पाटील यांनीही आघाडीवर निशाणा साधला आहे. यावर आजच्या सामनाच्या रोखठोक सदरात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा ही लोकशाहीची धोक्याची घंटा ठरत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या रोज सकाळी उठून मंत्र्यांवर नवा आरोप करतात व त्या मंत्र्यांच्या मतदारसंघात दौरे काढतात. सरकारने त्यांचे दौरे रोखू नयेत असं मला वाटतं,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
‘राजकारण्यांकडून विविध पातळ्यांवर मनोरंजन होतच असते. सध्याच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सीबीआय, ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांची हास्यजत्राच केली आहे. किरीट सोमय्यांचे आरोप हे साबणाचे बुडबुडेच ठरतात. महाराष्ट्राला व देशाला सुसंस्कृत विरोधी पक्षाची परंपरा आहे. पण आजच्या विरोधी पक्षाप्रमाणे त्यांच्याकडे हास्यजत्रा म्हणून पाहिले जात नव्हते,’ असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे.
‘ईडीच्या नावाने धमक्या द्यायच्या व चिखलफेक करायची हेच त्यांचे काम. सार्वजनीक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी टीका सहन करावीच लागते. वागताना, बोलताना तारतम्य ठेवावे लागते. सामनातील अग्रलेखावर चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त केली व एक खरमरीत पत्र सामनास पाठवले. त्यात भूमिका कमी व जळफळाटच जास्त. त्या पत्रात चंद्रकांत पाटलांनी अनेक ठिकाणी अपमानकारक, अब्रुनुकसानी करणारी विधाने करुनही ते प्रसिद्ध करण्याचे मोठेपण सामनाने दाखवले. पण लिहताना, बोलताना भान सुटले की स्वतःच्याच धोतरात पाय कसे अडकून पडतात ते या पत्रावरुन दिसते,’ अशी खोचक टीका राऊतांनी केली आहे.