जळगाव प्रतिनिधी : आधीच पेट्रोल डिझेल, गॅस, खाद्य तेल्याच्या किंमतीचा भडका उडाला असता आता त्यात ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती वाढू लागले आहे. गेल्या १५ दिवसात किरकोळ विक्रीत साखरेच्या दरात किलोमागे ५ ते ६ रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. जळगावात सध्या साखर प्रतिकिलो दर्जानुसार ३८ ते ४१ रुपयादरम्यान मिळत आहे. साखर महाग झाल्याने ऐन सणासुदीचा गोडवा कमी झाला आहे.
मागील काही महिन्यापासून साखरेचे भाव स्थिर होते. परंतु श्रावण महिन्यापासून साखरेचे दर वाढू लागले आहे. श्रावण महिना सुरू होताच एकापाठोपाठ एक सणांची मालिकाच सुरू होते. या काळात गोड पदार्थ बनविण्यासाठी साखरेला मोठी मागणी असते. परंतु साखरचे भाव वाढल्याने गोडवा कमी झाला आहे. या साखरेच्या भावातील वाढीने सामान्य ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक, चहाटपरी चालक यांना फटका बसला आहे.
यापूर्वी ४२ रुपयांपर्यंत प्रतिकिलाेचे गेलेले दर ३४ रुपयांपर्यंत उतरले हाेते. पण आता सणोत्सवाला सुरुवात झाली अन् मागणी वाढल्याने साखरेचे दर पुन्हा ३४ रुपयांवरून प्रतिकिलाे ३८ ते ४१ रुपयांपर्यंत वाढलेले आहेत.पॅकबंद ब्रँडेड साखरेचे दर ४५वरून ५० ते ५२ रुपयांवर गेले आहेत.