चंद्रपूर : मुली पटत नाही आणि भाव देत नाही त्यामुळे नाराज तरुणाने थेट आमदारानांच पत्र लिहिलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा मतदारसंघातील तरुणाचे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. भूषण जांबुवंत राठोड असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याने चक्क राजुऱ्याचे आमदार आमदार सुभाष यांना पत्र लिहिले.
भूषण हा राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या एका खेडेगावातील आहे. आपल्याला मुलगी पटत नाहीये आणि ही चिंतेची बाब आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत. दारू विकणाऱ्याला आणि काळ्या पोरांना गर्लफ्रेण्ड असते, हे बघून माझा जीव जळून राख होतो. तरी माझी आपणास विनंती आहे की, विधानसभा क्षेत्रातील तरूणींना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांना भाव द्यायला सांगितलं पाहिजे, असं पत्र तरूणाने लिहिलं आहे. दरम्यान, सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
पत्रात नेमकं काय?
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून मला एकही गर्लफ्रेण्ड नसल्याने चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेडेगावातून असून राजुरा-गडचांदूर येथे दररोज पेरी मारतो परंतु मला एकही मुलगी पटत नाही व दारु विकणाऱ्यांना काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेण्ड असते, ते बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा, असे भूषण राठोड याने लिहिलं आहे.
काय म्हणाले आमदार सुभाष धोटे…
‘मला एकही मुलगी पटत नाहीये’, असे पत्र भूषण जांबुवंत राठोड याने आमदारांना लिहिले. त्यावर बोलताना राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे म्हणाले, माझ्या राजुरा विधानसभा मतदारसंघातील एका अतिउत्साही तरुण कार्यकर्त्याने मला पत्र लिहिले. ते पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. पण हा तरुण अद्याप मला भेटला नाही. जर तो मला येऊन भेटला, तर आमदार म्हणून त्याला काय दुःख आहे. ते जाणून घेऊन त्याला नक्की मदत करू. पण पत्र लिहून परस्पर सोशल मिडियावर व्हायरल करणे, हे मला बरोबर वाटत नाही.