नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्याच्या मुद्दयावरून भाजपला फटकारले होते. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले होते. त्याला आता देवेंद्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “मुख्यमंत्री काय बोलले याच्यावर मी काहीही बोलणार नाही. समोरच्यांवर बोलण्यापेक्षा आपल्या सोबतच्यांना आणि आपल्या पक्षातल्या लोकांना आधी शिकवावं. मग आम्हाला सांगावं”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिल. ते नागपुरात बोलत होते.
ही आघाडी सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येक जण सत्तेचे लचके तोडतात. प्रत्येकजण सुभेदार असल्यासारखा वागतोय. प्रत्येक जण लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नाही लचके तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशाप्रकारची अवस्था या आघाडीची पहायला मिळतेय, असा घणाघात फडणवीस यांनी केला.
दरम्यान, मलाही माध्यमातूनंच कळलं की ईडीने अनिल देशमुखांविरोधात अशाप्रकारची लूकआऊट नोटीस काढली आहे. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाल्यानंतर आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोर जाणं अधिक योग्य होईल. तसाच निर्णय त्यांनी करायला हवा, असा सल्लाही फडणवीसांनी दिला.