मुंबई: राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे राज्यातील विविध ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. परंतु आता भारतीय हवामान विभागानं राज्यात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. उद्या रविवारी जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे. पावसाचा सर्वाधिक प्रभाव पुढील चार पाच दिवसात कोकणात राहणार आहे. मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांना अलर्ट –
चार आणि पाच सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला असून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सहा सप्टेंबरला कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तर मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर सात सप्टेंबरला नाशिक, औरंगाबाद, पालघरस ठाणे, जालना, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, तर ८ सप्टेंबरला पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.