चाळीसगाव : जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे चाळीसगावमधील नुकसानग्रस्तांची पाहणी करण्यासाठी आले आहे. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ईडीवरून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. कोणतीही चूक नसतांना विरोधी पक्षाच्या नेत्यांना नामोहरम करण्यासाठी ईडी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असं सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले आहे.
यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर केलेल्या भाष्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची भूमिका हीच की महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था होण्याच्या आधी ओबीसींचा प्रश्न सुटला पाहिजे. आमची बैठक झाली आहे. त्यामुळे वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 12 सदस्यांच्या नियुक्तीचा राज्यपालांनी लवकर निर्णय घ्यावा. राज्यपाल लवकर निर्णय घेत नसल्याने लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवले जात आहेत असं सर्वाना वाटतंय, असंही त्यांनी सांगितलं.