मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशासाठी कट ऑफ संदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अकरावी प्रवेशाची पहिली यादी २७ ऑगस्टला जाहीर होणार आहे. यावेळी त्यांनी विभागवार अकरावी नोंदणीची आणि अर्ज स्वीकारल्याची आकडेवारी जाहीर केली.
पहिल्या फेरीसाठी ३.७५ लाखांहून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे ३.०६ लाख अर्ज स्वीकारले गेले आहेत. FYJC गुणवत्ता यादी या फेरीत जाहीर केली जाईल तसेच नवीन अर्ज स्वीकारले जातील. सोबतच पुढे आणखी तीन फेऱ्या देखील होणार आहेत.
या फेऱ्यांमध्येही नवीन नोंदणी स्वीकारली जाईल. ही फेरी MMR आणि पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक येथील महामंडळाच्या भागातील अकरावी प्रवेशासाठी आहे. MMR हे मुंबई महानगर क्षेत्र आहे.’
शिक्षणमंत्र्यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले, ‘एमएमआर आणिइतर क्षेत्रांसाठी FYJC 2021-22 मध्ये केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेशाच्या पहिल्या सामान्य फेरीसाठी नोंदणी आणि पात्र अर्जांची स्थिती खालीलप्रमाणे आहे: अमरावतीमध्ये, नोंदणीची एकूण संख्या १० हजार ६७३ होती, त्यापैकी ८ हजार १५८ अर्ज स्वीकारले गेले. मुंबईत नोंदणीची एकूण संख्या २ लाख ३७ हजार ९५२ असून यामधील २ लाख २ हजार ५८ अर्ज स्वीकारले गेले.
नागपूर विभागात एकूण २७ हजार २३९ नोंदणी झाल्या त्यापैकी १९ हजार २५६ अर्ज स्वीकारले गेले. नाशिक विभागात नोंदणीची एकूण संख्या २२ हजार २११ होती त्यापैकी १६ हजार ७५३ अर्ज स्वीकारले गेले आणि पुण्यात एकूण ७७ हजार २७६ अर्ज दाखल झाले त्यापैकी ५९ हजार ८८६ अर्ज स्वीकारले गेले.