जळगाव प्रतिनिधी : पावसाचा जोर वाढल्याने हिरव्या पालेभाज्यांसह लिंबूच्या भावात मोठी भाववाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव थेट ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. किराणा साहित्य मात्र स्थिर आहे.
पावसामुळे एरव्ही पालेभाज्यांचे भाव अधिक वाढतात. मात्र, यावेळी तर भर पावसाळ्यात लिंबूचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ३० रुपये प्रति किलो असलेले लिंबू थेट ८० रुपये प्रति किलो झाल्याने ग्राहकांना चांगलीच झळ बसत आहे.
साखरेत एक ते दोन रुपयांची वाढ
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उचांकी गाठली होती. मात्र, सध्या खाद्यतेलाचे भाव स्थिर आहे. यामध्ये सोयाबीन तेल १५५, शेंगदाणा तेल- १७५, सूर्यफूल तेल १६०, पामतेल १३० रुपये प्रति किलो, तर तीळ तेल २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. किराणा साहित्यात साखरेत एक ते दोन रुपयांची वाढ होऊन ती ३७ ते ३८ रुपये प्रति किलोंवर असून, इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.
पावसाळ्यामुळे चहामध्येदेखील आल्याचा मोठा वापर होत असल्यामुळे आल्याचे भाव वधारले आहेत. ४० रुपयांवरून ते ५० ते ६० रुपये प्रति किलो झाले आहे. यासोबतच कोथिंबीरचे भावदेखील पुन्हा ६० रुपयांवरून ८० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे, तर फूलकोबीचे भाव २० रुपयांवरून ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
हिरवी मिरची स्वस्त
पालेभाज्यांचे भाव वाढत असताना हिरवी मिरची, लाल टोमॅटो, भेंडी मात्र स्वस्त झाली आहे. यामध्ये हिरवी मिरची १५ ते २० रुपये प्रति किलोवर, तर टोमॅटो २० रुपये, भेंडी २० रुपये प्रति किलोवर आली आहे.