जळगाव प्रतिनिधी : शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे शिवसेनेत अस्वस्थ असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात येतील असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी राणेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.
“नारायण राणे पहिले किती दिवस अस्वस्थ होते हे आपण पाहिले आहे, त्यामुळे त्यांचा अस्वस्थपणा निघाला आहे. पहिले ते शिवसेनेत अस्वस्थ होते, त्यानंतर ते काँग्रेसमध्ये अस्वस्थ झाले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना सूक्ष्म लघु उद्योग खाते मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे डोकेही सूक्ष्म झाले आहे”, अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.
एकनाथ शिंदे हे दिघे साहेबांचे चेले आहेत. ज्या दिघे साहेबांनी ठाण्यात शिवसेनेचा झेंडा फडकवत ठेवला, त्यांचे ते चेले आहेत. चुकीचा हवामानाचा अंदाज जसा असतो, जेव्हा पाऊस पडेल असं सांगितलं जातं, तेव्हा तो पडत नाही आणि पडणार नाही असं सांगितलं जातं, तेव्हा पडतो. तसा नारायण राणेंचा हा पोकळ अंदाज आहे, असंही पाटील म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काय म्हणाले होते राणे?
‘एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते मंत्री आहेत. त्यांना निर्णयाचं स्वातंत्र्य नाही. त्यांच्या खात्यात मुख्यमंत्र्यांचा व ‘मातोश्री’चा हस्तक्षेप असतो. त्यामुळं शिंदे कंटाळले आहेत. ते मार्गाच्या शोधात आहेत,’ असं राणे यांनी म्हटलं होतं. अर्थात, शिंदे यांनी राणेंचा दावा लगेचच फेटाळला होता. हा शोध राणेंनी कुठून लावला माहीत नाही? मला निर्णयाचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. राणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,’ असं शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.