मुंबई : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संसर्गाचा धोका अजून टळलेला नाही. कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर अखेरपर्यंत येईल अशी शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली आहे. ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. तो ज्यावेळी 700 मेट्रिक टन टच करू एवढं ऑक्सिजनची गरज आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गरज पडल्यास राज्यात कदाचित लॉकडाऊन लावावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
मुंबई महानगर पालिका आणि मुंबई विद्यापीठाने लहान मुलांचे कोव्हिड सेंटर उभारले आहे. त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोविडच्या सद्यस्थितीवर बोट ठेवत तिसरी लाट आणि लॉकडाऊन यावर महत्त्वाचे विधान केले. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. या संकटावर आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मात करायची आहे. मात्र, आपण जर अशाच पद्धतीने गर्दी करत राहिलो आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही तर कोरोनाची तिसरी लाट अपेक्षेपेक्षा आधीच येईल, अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज्यात ऑक्सिजनच्या साठ्यात अजून विशेष वाढ झालेली नाही. त्यामुळे रुग्णवाढ झाली आणि उपलब्ध असलेल्या साठ्यापर्यंत आपण पोहचलो व तितकी ऑक्सिजनची गरज भासू लागली तर कदाचित आपल्याला पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल, असा थेट इशाराच मुख्यमंत्री ठाकरे यानी दिला व कोविड नियम पाळण्यासाठी आग्रह धरला.