नवी दिल्ली : आता मोठी शहरेच नाहीत तर छोट्या शहरांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे महागात पडणार आहे. केंद्र सरकारने वाहतुकीचे नियम कडक केले असून राज्यांना तयारी करण्याचे आदेश पाठविले आहेत. महत्वाचे म्हणजे यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरे आहेत.
वाहतूक नियम मोडल्याचे इलेक्ट्रॉनिक रुपात रेकॉर्ड केले जाणार आहे. आणि 15 दिवसांत त्याचे चलन वाहन मालकाला पाठविले जाणार आहे.राज्यांमध्ये वाहतूक नियंत्रण संस्था, रस्ते परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. याद्वारे हे ई चलन पाठविले जाणार आहे.
याशिवाय राज्यांना जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे, स्पीड डिटेक्शन कॅमेरे आदी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय याची माहिती लोकांना देण्यासही बजावण्यात आले आहे. नियम मोडल्यापासून पंधरा दिवसांच्या आत हे चलन पाठविले जाईल. हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन भरल्यानंतर नष्ट केले जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांहून जास्त आहे, तिथे. सर्व राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि महत्वाच्या रस्त्यांवर, चौकात ही यंत्रणा उभी केली जाणार असून त्याचा इशारा देणारे फलकही स्पष्टपणे लावण्यात यावेत असे आदेशात म्हटले आहे.मंत्रालयाने सांगितले की, मोटर वाहन नियमांमध्ये बदल केले त्यांचा उद्देश देशभरात नियमांचे उल्लंघन कमी करणे आणि वाहतुकीचे नियम लागू करण्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणणे हा आहे.
नोटिफिकेशनमध्ये जवळपास 132 शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 शहरे आहेत, आणि राज्य सर्वात वर आहे. यानंतर उत्तर प्रदेश 17 आणि आंध्र प्रदेश 13 शहरे आहेत.या शहरांमध्ये स्पीड कॅमेरा, क्लोज सर्किट टेलिव्हिजन कॅमेरा, स्पीड गन, बॉडी कॅमेरा. डॅशबोर्ड कॅमेरा, ऑटो नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR), वेट इन मशीन (WIM) आदी उपकरणे लावण्यात येणार आहेत.
काही शहरांमध्ये आधीपासूनच ई-चलन सिस्टम सुरु आहे. तिथेही ही उपकरणे वाढवण्यात येणार आहे. यामुळे चलनांची संख्या वाढणार आहे. असे झाल्यास ही चलने पाठविण्यासाठीची वेळ वाढणार आहे. आता त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चलन येते.